गढूळ पाणीपुरवठ्यामुळे सुशीगाववासीयांचे आरोग्य धोक्यात
ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष
सुशी दाबगाव : मागील काही दिवसापासून गावामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आले. याबाबत ग्राम पंचायत प्रशासन मात्र ढिम्म असून गढूळ पाणीपुरवठ्याची दखल संबंधित विभागाकडून अद्याप घेण्यात आली नाही. ग्रा.पं. च्या बेताल कारभारामुळे नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे.
उन्हाळयाच्या सुरूवातीलाच अंधारी नदीमधील जलसाठ्यात घट होवू लागली आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे गावकऱ्यांना पाणी
टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली असून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नळाला गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नदीमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने
पाण्याची टाकी पूर्णपणे भरली जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठयाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहेत. अवेळी पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाण्याची वेळ सांभाळण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. दोन ऐवजी गावातील काही भागात दिवसाआड पाणीपुरवठा होऊ लागला आहे. अपुऱ्या व अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता त्यांना गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून गावात गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे. मातीमिश्रित खराब पाणी नागरिकांना देण्यात येत आहे. गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणीपुरवठा गढूळ का होत आहे, किती दिवस पाणी गढूळ येणार आहे, याची माहिती ग्रामपंचायत प्रशाशनाकडून नागरिकांना दिली गेली नाही. गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे स्तनदा, गरोदर, व नवजात बालकांच्या जीवितास मोठा धोका झाला असून मलेरिया, टायफॉइड, फायलेरिया आदी आजार बळावण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तथा ग्रामसेवकांकडे तोंडी तक्रारी नोंदवली, अद्यापही याची दखल घेण्यात आली नाही. संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून समस्या निकालात काढावी, अशी मागणी सुशी येथील नागरिकांनी केली आहे.







