भांडे घासत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला महिला ठार
वाघाच्या तोंडातील पत्नीला वाचविण्यासाठी पतीची केविलवाणी धळपळ
प्रतिनिधी मुल : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्याचंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमनाथ पर्यटन स्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये घडली.अन्नपूर्णा बिलोणे (५२) आणि त्यांचे पती तुलसीराम बिलोणे हे बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये राहत होते. आज पहाटे ४.३० वाजता अन्नपूर्णा त्यांच्या घराच्या अंगणात भांडी घासत होत्या. त्याचवेळी एका वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
पतीचा धाडसी प्रयत्नअन्नपूर्णा यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती तुलसीराम तातडीने बाहेर आले. त्यांनी पाहिले की वाघाने अन्नपूर्णा यांच्या गळ्याला पकडले आहे. घाबरून न जाता, तुलसीराम यांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी वाघाशी दोन हात केले. त्यांनी अन्नपूर्णा यांचे पाय धरून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला, पण वाघाच्या ताकदीसमोर त्यांचा जोर कमी पडला. शेवटी, त्यांनी जवळच पडलेली एक काठी घेऊन वाघावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर वाघ तिथून पळून गेला, पण दुर्दैवाने अन्नपूर्णा यांचा जागीच मृत्यू झाला होता.
प्रशासकीय कार्यवाही
घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तात्काळ, मेजर राष्ट्रपाल कातकर, धनराज नेवारे, वेदनाथ करंबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उप-जिल्हा रुग्णालयात पाठवला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृत महिलेच्या पतीला तात्काळ २०,००० रुपयांची मदत दिली.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.







