स्मशानभुमीच्या जागेसाठी मुल तहसीलकार्यालयावर कफनपेटी मोर्चा
कफनपेटी आणली मांगण्या मान्य झाल्या नाहीतर मृतदेह आणुन ठेवु: ख्रिस्ती समाजबांधवाचा निर्धार
मूल (तालुका प्रतिनिधी): गेल्या 40 वर्षापासुन ख्रिस्ती समाजासाठी स्वतंत्र स्मशानभुमीची जागा मिळावी यासाठी प्रयत्न करूनही, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज सोमवारी (7 ऑक्टोंबर) रोजी सेंट स्टीफन चर्च मूल च्या वतिने मूल तहसील कार्यालयावर ख्रिस्ती समाज बांधवां कडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसले.
मुल येथील सेंट स्टिफन चर्च पासुन सुरू झालेल्या कफनपेटी मोर्चा गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी स्मशान भूमीसाठी जागा मिळालीच पाहिजे, असाकासा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा एका ना अनेक नारेबाजी व वेगवेगळया घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर येताच संपुर्ण तहसील प्रशासन खळबळुन जागे झाले. तहसील कार्यालयासमोर गेलेल्या कफनपेटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोष रावत, कॉंग्रेसचे नेते राजु झोडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय सिध्दावार, सेंट स्टिफन चर्चचे सचिव डॉ. मार्टीन अझिम, अॅड. अश्विन पॉलीकर यांनी सभेला संभोधित केले. यावेळी बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गुरू गुरनुले, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल भडके सह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी अजय चरडे तहसीलदार मृदुला मोरे यांनी सभामंडपात येवुन मोर्चेकर्याचे निवेदन स्विकारले.
ख्रिस्ती समाजासाठी स्मशानभुमी मिळावी यासाठी समाजबांधव प्रयत्नरत असताना सन 1986 मध्ये उपविभागीय अधिकारी मूल यांनी मूल येथील गट क्रं 443 मधील आराजी 1.38 हेक्टर जमीन ख्रिस्ती समाजाच्या स्मशानभुमीसाठी मंजुर करण्यात आली होती, त्याजागेवर संरक्षणभिंत उभारून देण्याची मागणी समाजबांधवानी 1989 मध्ये नगर पालीकेला केली होती, मात्र नगर पालीकेने संरक्षणभिंत उभारून न दिल्याने त्याठिकाणी काही नागरीकांचे अतिक्रमण असल्याने समाजबांधवानी प्रशासनाला अतिक्रमण काढुन देण्याची मागणी केली मात्र प्रशासन काढुन दिले नाही, त्यानंतर 1991 मध्ये सर्व्हे नं. 282 या जागेची मागणी उपविभागीय अधिकारी यांचेकडे समाजबांधवानी केली मात्र त्याकडेही प्रशासन नेहमीसारखे दुर्लक्ष केलेले आहे. 8 सप्टेंबर 24 रोजी मूल तालुक्यातील आदर्शखेडा येथील आनंदाबाई जानबा अल्लीवार या महिलेचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचा असा प्रश्न समाजबांधवांपुढे निर्माण झाल्याने यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रेत नेऊन ठेवण्यात आले व प्रेतक्रिया कुठे करायची असे प्रश्न प्रशासनास केल्याने प्रशासनही खळबळुन जागे झाले आणि उपविभागीय अधिकारी मूल, नायब तहसीलदार, पालकमंत्र्यांचे स्विय सचिव, संेट स्टीफन चर्चेचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन ख्रिस्तीसमाजासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला परंतु अजुनही स्मशानभुमीच्या जागेचा प्रश्न कायम आहे. यामुळे सेंट स्टिफन चर्चच्या वतिने कफनपेटी मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.
यावेळी कोणतेही अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.







