📰 अबब! ऐकावे ते नवलच… नव्या रस्त्याला ‘टाके’; महामार्गाची दुर्दशा उघड
चामोर्शी (प्रतिनिधी) :
अबब! ऐकावे ते नवलच… करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या चामोर्शी – गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील सिमेंट रस्ता काही महिन्यांतच भेगांनी विदीर्ण झाला आहे. या भेगांवर सध्या जणू ‘टाके’ मारल्यासारखी दुरुस्ती सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
नुकताच बांधण्यात आलेला हा सिमेंट काँक्रीट रस्ता अल्पावधीतच ठिकठिकाणी खराब होऊ लागल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करोडो रुपयांचा खर्च होऊनही रस्ता इतक्या लवकर निकामी होणे ही बाब नागरिकांसाठी चिंताजनक ठरत आहे.
गोविंदपूर परिसरात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची स्थिती पाहता, रस्त्यावरील भेगांवर ‘टाके’ मारण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येते. नव्या रस्त्याची अशी अवस्था होणे हे संबंधित कंत्राटदार व प्रशासनाच्या कामकाजावर संशय निर्माण करणारे आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, बांधकामादरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असण्याची शक्यता असून त्यामुळेच रस्ता अल्पावधीतच भेगांनी व्यापला आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये जर अशी हलगर्जीपणा होत असेल, तर हा गंभीर विषय असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
चामोर्शी – गडचिरोली हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तसेच खनिज व औद्योगिक वाहतुकीमुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा परिस्थितीत टिकाऊ रस्ता अपेक्षित असताना त्याची झालेली दुरवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकामातील त्रुटी व निकृष्ट साहित्याचा वापर झाला का याची सखोल तपासणी करावी. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी प्रशासनाकडे केली आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विजय लाड यांनी दिला आहे.







