गडचिरोली : बांधकाम कामगारांच्या मुलांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहू दिले जाणार नाही, असा ठाम इशारा NSUIचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी दिला आहे. संबंधित योजनेचा लाभ वेळेत मिळत नसल्याने नवविवाहित युवकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्ड दरवर्षी नूतनीकरण (रिन्यूअल) केले जाते; मात्र या प्रक्रियेदरम्यान लाभ वितरणात होणाऱ्या विलंबामुळे विवाहित युवकांना अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः बांधकाम कामगारांच्या मुलांच्या पहिल्या विवाहासाठी दिली जाणारी आर्थिक मदत वेळेत मिळावी, अशी मागणी वैरागडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. योजनेची अंमलबजावणी जलदगतीने पूर्ण करावी, अन्यथा प्रशासन कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. “युवकांसाठी आक्रमक भूमिका घेत, योजनेचा लाभ वेळेत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आरोग्य उपचार, शिष्यवृत्ती, साहित्य वाटप आदी विविध लाभ दिले जातात. हे सर्व लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचले पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अभिषेक चौधरी, निखिल ढवरे, प्रेमानंद गोंगले, गितेश तिलकपलीवार, खुशाब मेषाखेत्री आणि प्रफुल भांडेकर उपस्थित होते.