चामोर्शी: जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी येथे आयोजित स्नेहसंमेलनाचा शुभारंभ आज राष्ट्रीय एकात्मतेचा अद्भुत संदेश देणाऱ्या नाविन्यपूर्ण रॅलीने झाला. उद्घाटन डॉ. देवरावजी होळी (माजी आमदार गडचिरोली) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार, प्रेमाताई आईंचवार (अध्यक्ष भौतिक विकास व विद्यार्थी सुरक्षा समिती), मंदाताई वानखेडे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), तुषार दुधबावरे (सन्मा. सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती), प्राचार्य मिना गद्देवार, दिलीपजी चलाख (जिल्हा सचिव भाजपा), पुरुषोत्तम घ्यार (सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती) यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे—प्रत्येक वर्गाने एका राज्याची पारंपरिक वेशभूषा धारण करून त्या राज्याचे प्रतिनिधित्व केले. पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक आदी राज्यांची सांस्कृतिक ओळख रंगीत पोशाख, घोषवाक्ये आणि सजावटीतून खुलून दिसली. यामुळे क्षणभर चामोर्शीच्या रस्त्यांवर “लघु भारताचे” अप्रतिम दर्शन घडले. विद्यार्थ्यांनी “विविधता हीच आपली ताकद… हम सब एक हैं!”, “कश्मीर हो या कन्याकुमारी—भारत माता एक हमारी!”, “प्रांत-भाषेचा भेद नको, भारतमातेची मुले एकच!” अशा प्रभावी घोषणांनी शहर दुमदुमवले. नागरिक, पालक व उपस्थितांनी या रॅलीचे कौतुक करताना म्हटले की, “अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, बंधुता, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय अभिमान बळकट होतो—ही खरी शिक्षणाची वाट आहे.” एकंदर पाहता जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने घेतलेला हा मूल्याधिष्ठित व नाविन्यपूर्ण उपक्रम—राष्ट्रीय एकात्मतेचा सशक्त संदेश देणारा आणि प्रेरणादायी ठरला आहे.