सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
प्रेस नोट
चामोर्शी: जागतिक पातळीवर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यायचा असेल तर शालेय वयातच तयारीला सुरुवात करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस स्टेशन चामोर्शीचे पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांनी केले.
चामोर्शी येथील यशोधरा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्श संस्था आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय “गुरु-शिष्य संवाद” कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विज्ञान प्रदर्शनीच्या फीत कापून करण्यात आले. यावेळी चामोर्शी नगरपंचायतीच्या अध्यक्ष जयश्री वायललवार, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी येरमे, कनिष्ठ अधिव्याख्याता प्रेमानंद वालदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्याम रामटेके होते.
विज्ञान प्रदर्शनीतील विविध प्रतिकृतींचे निरीक्षण करताना ग्रामीण विद्यार्थ्यांमधील उर्जा, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण कल्पनांची क्षमता पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण विद्यार्थी योग्य दिशादर्शन मिळाल्यास देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात, असे मत अध्यक्ष जयश्री वायललवार यांनी व्यक्त केले. यावेळी माधुरी येरमे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील गुणांचे कौतुक केले. स्पर्शचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील हेतू व उद्दिष्टे स्पष्ट केली, तर प्राचार्य रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक उपक्रमांत सक्रीय सहभागासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे संचालन लुकेश सोमणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्पर्श संस्थेच्या सचिव रोझा खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद चिंतलवार, अली आझम, श्रेयश चांदेकर, सुरज चौधरी, पंकज मेश्राम, शीतल गावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी यशोधरा विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.