चामोर्शी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठ्याचा अक्षरशः लपंडाव सुरू असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दर अर्ध्या-अर्ध्या तासाला वीज खंडित होत असल्याने घरगुती कामकाज, व्यापारी व्यवहार, विद्यार्थी व रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे महावितरण (MSEB) प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक लाईन जाणे, पुन्हा येणे आणि काही वेळातच पुन्हा बंद होणे हा रोजचाच प्रकार बनला आहे. विजेच्या कमी जास्त व्होल्ट मुळे उपकरण पंखे, कुलर, फ्रिजसारखी आवश्यक उपकरणे बंद पडत असून लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा मोठा परिणाम होत आहे. ऑनलाइन शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सततच्या वीज खंडिततेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून इन्व्हर्टर व विद्युत उपकरणे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयात तक्रारी करूनही केवळ “लाइन मध्ये बिघाड आहे” एवढेच उत्तर दिले जात असून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. देखभाल-दुरुस्तीचा अभाव, जुनी यंत्रणा व कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळेच ही स्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होत आहे की,
चामोर्शीतील नागरिकांनी नियमित वीजबिल भरूनही अशी गैरसोय का सहन करावी?
महावितरण प्रशासन जबाबदारी कधी स्वीकारणार?
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे लक्ष आहे की नाही?
जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.