सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
“नावापुरते प्रतिनिधी, वास्तवात शून्य कारभार”
चामोर्शी(प्रतिनिधी)
चामोर्शी नगरपंचायत क्षेत्रातील काही प्रभागांमध्ये
लोकप्रतिनिधींची उदासीनता आता उघडपणे जनतेच्या संतापात बदलताना दिसत आहे. निवडणुकीच्या काळात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा, नळपाणी, लाईट, कचरा व्यवस्थापन, रस्ते व बांधकामांची आश्वासने देणारे काही नगरसेवक निवडणूक संपताच अक्षरशः ‘गायब’ झाल्याची चर्चा प्रत्येक वॉर्डात सुरू आहे.
कित्येक वर्षांचा कालावधी लोटून गेला तरी संबंधित वॉर्डात नगरसेवकांचा पत्ता नाही. समस्या ऐकण्यासाठी येणे तर दूरच, वर्षानुवर्षे त्यांचा चेहराही नागरिकांनी पाहिलेला नाही. परिणामी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, लाईटची बिघाडे, कचऱ्याचे ढीग अशा मूलभूत प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
“निवडणुकीत मत मागायला येतात, पण नंतर वॉर्डात पाऊलही ठेवत नाहीत,” असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटत आहे. केवळ पैशांच्या जोरावर निवडून येणारे, जनतेशी कोणताही संपर्क न ठेवणारे नगरसेवक आता नकोत, अशी स्पष्ट भूमिका नागरिक घेताना दिसत आहेत.
यावेळी ‘नवीन चेहरा, पक्के काम’ हाच अजेंडा नागरिकांनी ठरवला आहे. वॉर्डात कायम उपलब्ध राहणारा, आपुलकीने समस्या ऐकणारा, तत्परतेने काम करणारा आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारा नगरसेवक ही काळाची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
चामोर्शीतील हा वाढता असंतोष येत्या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता दर्शवत आहे. जनतेला केवळ आश्वासनांचे फुगे नकोत, तर प्रत्यक्षात काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत—आणि याच भूमिकेतून अशा ‘गायब नगरसेवकांना’ योग्य धडा शिकवण्याचा निर्धार आता वॉर्डावॉर्डात ऐकू येत आहे.
चामोर्शी नगर पंचायत समस्येच्या विळख्यात.
1)वार्डात अनेक समस्या,गटारे,कचरा कामे अपूर्ण.
2) खूप वर्षांपासून फवारणी बंद झाल्यामुळे,डासांचे प्रमाणात वाढ,
3)काही भागात दिवाबत्ती ची सोय नाही.
4) काही भागात नाल्यांचे पूर्ण बांधकाम नाही
5) सिमेंट कोंक्रेट रोड बनलेले काही वर्षातच तीन तेरा वाजले.
6) जंतुनाशक धूर फवारणी नाही.
चामोर्शी नगरपंचायत अंतर्गत विकासाची कामे केली जाते,परंतु हनुमान वार्डातील घोट रस्त्याला जोडलेला मुख्य रस्त्याचा तीन तेरा वाजले तरीसुद्धा स्थानिक प्रतिनिधी चे याकडे लक्ष नाही,विकासाच्या नावावर लोकांकडून नगर पंचायत टॅक्स वसूल केले जाते परंतु त्या मोबदल्यात विकास शून्य आहे,असे लोकांचे मत आहे,
केंद्र शाळा ते जुना तहसील रोड हा पक्का सिमेंट बांधकाम असून फक्त राजमाता आश्रम शाळा इथपर्यंत कांम झालेले आहे तिथून तर जुना तहसील रोड खड्डेमय होऊन गेले आहे,हा आश्रम शाळेपासून रस्ता अजून पर्यंत बनला नसून लोकांना,शाळेतील मुला मुलींना ये जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे,








