पोटाची खळगी भरण्याकरिता गेलेल्या मजुरांचा अपघातात मृत्यू ; सर्वत्र हळहळ
तेलंगणातील अपघातात तीन महिला मजूर जागीच ठार, सात गंभीर जखमी
मंचेरियल चेन्नूर येथे उभ्या पिकअपला ट्रकची धडक: रोवणीसाठी सुलतानाबाद येथे निघाले होते मजूर
मूल (चंद्रपूर) तेलंगणातील सुलतानाबाद येथे रोवणी करण्यासाठी मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअपला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मूल व पोंभुर्णा तालुक्यातील तीन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही भीषण घटना तेलंगणातील मंचेरियल चेन्नूर येथे रविवारी (दि. २१) पहाटे ३:३० वाजता घडली.
मीना अनिल लाटेलवार (४५, रा. चांदली बु.), विमल अरुण सोयाम (४६, रा. बेंबाळ, ता. मूल), लीलाबाई दादाजी मंढरे (४५, रा. दिघोरी, ता. पोंभुर्णा) अशी मृतांची नावे आहेत. जखमींना सुलतानाबाद स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
मूल तालुक्यात खरीप हंगाम संपल्यानंतर स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजुरांना स्थलांतराचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. चांदली बु. येथील राजेश लाटेलवार यांच्या एम.एच-३४ सी. क्यू. ०२९८ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने तेलंगणातील सुलतानाबाद येथे रोवणीच्या कामासाठी हे मजूर रवाना झाले होते. या पिकअपमध्ये चांदली बु,, दिघोरी, केळझर व नागाळा येथील १० मजूर प्रवास करत होते.
रविवारी पहाटे पाठीमागून येणाऱ्या भरधाव टी. एस. २५ टी- २८९९ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली. धडकेत मीना लाटेलवार, विमल सोयाम, लीलाबाई मंढरे या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. विकास विश्वनाथ टेकाम (२८), साधना विकास टेकाम (२६, रा. चांदली बु.), सुरमा सुधाकर भेंडारी (२८), रेखा विजय गावतुरे (४५, रा. केळझर) ममता लक्ष्मण उईके (वय ४५) पौर्णिमा सुरेश उईके (वय ३०)
शकुंतला पप्पू टेकाम (वय ३२) मेघा कार्तिक श्रीरामें (वय ३३) सर्व राहणार नागाळा तालुका चंद्रपूर रहिवासी आहेत. हे गंभीर जखमी झाले. जखमींना सुलतानाबाद रुग्णालयात भरती करण्यात आले.
चांदली, बेंबाळ, दिघोरीत शोककळा
मजुरीसाठी तेलंगणात गेलेल्या तीन महिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच चांदली, बेंबाळ व दिघोरीत शोककळापसरली आहे.कुटुंबीयांचे नातेवाईकतेलंगणातीलसुलतानाबाद येथे रवाना झाले.मंगळवारी (दि. २३)तीनही महिलांचे मृतदेहगावात आणण्यातयेणार असल्याची माहिती आहे.







