गडचिरोली जिल्यात अनेक तालुक्यातील शेतकरी आज गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रति हेक्टर जवळपास ३० क्विंटल धान उत्पादन येऊन त्याची बाजारातील एकूण किंमत सुमारे ७५,000 रुपये असते. मात्र खत, बियाणे, मजुरी, फवारणी, सिंचन, वाहतूक अशा सर्व खर्चांची बेरीज केली की उत्पन्नाइतका खर्चच शेतकऱ्याच्या खिशातून जातो, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
बाजारात धानाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतीतून काहीच हाती लागत नसल्याची भावना व्यापकपणे व्यक्त होत आहे.
धानाला भाव नाही, शेतकरी हवालदिल
उद्योगांना पाठबळ; पोशिंद्याची कोणीच खबरबात नाही
धानाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडले असून “घर कसं चालवावं?” हा प्रश्न त्यांना सतावत आहे. सरकारकडून मोठ्या उद्योगांना सतत पाठबळ मिळत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कायमच दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होत आहे.
आपल्या मेहनतीच्या घामातून देशाला अन्न देणाऱ्या पोशिंद्याचा वालीच नसल्याचे सूर शेतकऱ्यांच्या मनातून उमटू लागले असून तात्काळ योग्य भाव, हमी दर आणि शेतमाल खरेदी प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे.
शासनाने दिला जाणारा हमीभावही पुरेसा नसल्याने शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. “उत्पन्न वाढलं, खर्च वाढला; पण भाव मात्र जागेवरच… अशा परिस्थितीत शेतकरी जगायचं कसं?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतकरी शिवराम नारायण बारसागडे,(भोगणबोडी),मधुकर सातपुते,(चामोर्शी),नंदकिशोर चलाख(कुरुड),शेषराव नानाजी जुआरे(भोगनबोडी हेटी),शंकर पैकू चलाख(भोगनबोडी हेटी),रुपेश वासेकर(भिवापूर),खल्लीर बारसागडे(कानोली) अशे शेतकरी चिंतेत असून जगायचं कसं?असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे,
या दुरवस्थेतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की धानाला किमान उत्पादन खर्चापेक्षा जास्त आणि स्थिर हमीभाव मिळावा, तसेच खरेदी प्रक्रियेत होणाऱ्या त्रुटींवर तत्काळ नियंत्रण आणावे.
धनसंपन्न राज्यात आयुष्यभर जमिनीवर घाम गाळणारा शेतकरीच जेव्हा आपल्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह पाहतो, तेव्हा प्रशासनाची परीक्षा सुरू झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे.