सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
घोट::-
गडचिरोली तालुक्यातील नवोदय विद्यालयाच्या ‘घोट’ येथील विद्यार्थ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शासकीय निधी न मिळाल्यामुळे हॉस्टेल परिसरातील मॉड्युलर टॉयलेटचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अमानवीय परिस्थितीत राहावे लागत आहे.
त्यात भर म्हणून हॉस्टेलची इमारत अत्यंत जर्जर झाली आहे. भेगा पडलेल्या भिंती, कोसळण्याच्या मार्गावर असलेली छताची स्थिती, सुरक्षिततेचा कोणताही पत्ता नाही — या सर्वांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीच ठोस कारवाई किंवा निधी उपलब्ध झालेला नाही. “निधी अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षणच नव्हे तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे” अशी परखड प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांकडून ,स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र नेहमीचीच जुनी “लवकरच उपाययोजना करू” हीच ढोबळ प्रतिक्रिया. प्रत्यक्षात मात्र आश्वासनांचे बाष्कळ बुडबुडे सोडून प्रशासनाने पाठ फिरवल्याचे वास्तवच अधिक प्रकर्षाने जाणवते.
शासनाला, जनप्रतिनिधींना आणि जिल्हा प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची किंमत नाही का?
हॉस्टेलची अवस्थाच अशी असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा कशी करायची?
जिल्ह्यातील नवोदय विद्यार्थी आजही असुरक्षित, अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थितीत राहण्यास मजबूर आहेत. प्रश्न फक्त इमारतीचा नाही, तर भविष्यातील पिढीच्या सुरक्षिततेचा आहे — आणि याकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेला आता जबाबदार धरण्याची गरज निर्माण झाली आहे.









