HomeBreaking Newsमानव - वन्य प्राणी संघर्ष गंभीरबाबी बाबत महत्त्वपूर्ण बैठक

मानव – वन्य प्राणी संघर्ष गंभीरबाबी बाबत महत्त्वपूर्ण बैठक

मानव – वन्य प्राणी संघर्ष गंभीरबाबी बाबत महत्त्वपूर्ण बैठक

वाघाच्या हल्यात महिनाभरात अनेकांचा नाहक बळी 

लोकवाद दुर्योधन घोंगडे चंद्रपूर, दि. ३१ – जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड महिन्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत चालला आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे नाहक जीवितहानी होत असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली. ग्रामस्थ तसेच जनावरांच्या जीवित नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन, वनविभागाने वाघांच्या होणाऱ्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

मुल तालुक्यातील वाघांच्या हल्ल्यांत ठार झालेल्या नागरिकांसंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत रामबाग विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे, विभागीय वनअधिकारी (प्रोटेक्शन) निकिता चौरे, सहाय्यक वनसंरक्षक (बफर) संकेत वाठोरे, आदेश शेडंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकार, प्रियंका वेलमे आदींची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भगवानपूर गावातील वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तातडीने कुंपण मंजूर करून घेणे. मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगलामध्ये पडून असणारे बांबू कुंपणासाठी उपलब्ध करून द्यावेत.यासाठी वनविभागाने गावात जाऊन शेतकऱ्यांची नोंदणी करावी व शेतकऱ्यांना बांबूचा पुरवठा करावा. एफडीसीएमसह वनविभागाने कुंपणासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करावे. भगवानपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 20 मीटर अंतरावरील झुडपे कापण्यात यावीत.

वाघाचे होणारे हल्ले टाळण्यासाठी सरपनासाठी कोणीही जंगलात जाऊ नये. गावकऱ्यांना सरपन आवश्यक असल्यास त्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा. यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना वनविभागाकडून सरपन उपलब्ध करून देण्यात यावे.

गत दीड महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये नऊ ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून, याबाबत वनविभागाने वाघांची अचूक माहिती घ्यावी. मागील दोन वर्षांत 22 वाघांना पकडण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाचा विचार करता, अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रसंगी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये प्राथमिक बचाव दल (PRT) तैनात करण्यात आले असून, त्यात एकूण 917 सदस्य कार्यरत आहेत.

शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणीद्वारे जशी पिकांची माहिती संगणकीकृत प्रणालीतून गोळा केली जाते, तशीच एक सुसंगत प्रणाली वनविभागासाठीही तयार करता येईल. सोलर कुंपणाच्या बाबतीत तांत्रिक माहिती घेऊन स्वतंत्र माहितीपत्रक तयार करावे.

दुर्गापूर परिसरात बिबट्याचा वावर अधिक असल्याने दुर्गापुर, वनअकॅडमी पासून ते सिनाळा गावापर्यंत ॲडव्हान्स सोलर फेंसिंग करण्यासाठी कॅम्पाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निधीस मंजूरी मिळालेली असली तरी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. याबाबत पाठपुरावा करावा. ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून वाईल्डलाईफ क्लिअरन्स घेण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.

पिपरी दीक्षित येथील स्मशानभूमीची जागा महसूल विभागाच्या अखत्यारीतील असून त्याला लागूनच वनविभागाची जागा आहे; मात्र, वनविभागाकडून चुकीची मोजणी करण्यात आली असून चुकीचा नकाशा तयार करण्यात आला आहे. याबाबत मुल तहसीलदारांनी विशेष लक्ष देवून पाठपुरावा करावा.

वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी समन्वय साधून मूल बायपासचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावावा.

तेंदूपत्ता हंगामात 50 ते 60 हजार लोक जंगलात जातात, मात्र ते वनविभागाच्या नियमांचे पालन करत नाहीत तसेच ठरावीक समूहांमध्ये राहत नाहीत, त्यामुळे वनविभागाला जंगलावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. परिणामी, वाघांचे हल्ले वाढून मनुष्यहानी होते. अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डाॅ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments