सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली:- लगाम–अल्लापल्ली मार्गावर लॉयड मेटल(Llyod Metal) कंपनीच्या ट्रकांमुळे नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झाला आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने परिसरात प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. सततच्या धुळीमुळे दमा, खोकला, ऍलर्जी यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, प्रशासन आणि संबंधित कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, लगाम ते अल्लापल्ली या रस्त्याचे कामही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. अर्धवट रस्त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली असून धुळीचा त्रास दुपटीने वाढला आहे. रस्ता लवकर पूर्ण करण्याची मागणी अनेक वेळा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षांनी तीव्र भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. “लॉयड मेटलच्या ट्रकांमुळे होणारा त्रास तात्काळ थांबवावा आणि लगाम–अल्लापल्ली रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आझाद समाज पार्टी युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी दिला आहे.
गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना प्रशासन कधी जागे होणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.