सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली::-
गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गावोगावी चर्चा फक्त एकच — “निवडणुका लागल्या की काही नेत्यांचे रंग त्वरित बदलतात!”
राजकारणातील ही रंगबदलाची सवय आता इतकी उघड झाली आहे की मतदारही उघडपणे टीका करू लागले आहेत.
कालपर्यंत एका पक्षाच्या मंचावर स्वतःला ‘विकासाचे शिल्पकार’ म्हणवून घेणारे बरेच लोकप्रतिनिधी, आज अचानक दुसऱ्या पक्षाच्या दारात नतमस्तक होताना दिसत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी झालेले हे पक्षांतर म्हणजे खरी लोकशाहीची थट्टा, असा आरोप नागरिक करत आहेत.
ग्रामीण भागात तर नाराजी अधिकच तीव्र आहे.
“पाच वर्ष जनता विसरलेले, कामांचा मागोवा नसलेले आणि हिशोब द्यायची वेळ आली की पक्ष बदलून स्वतःची सोय बघणारे हे लोकप्रतिनिधी आम्हाला मान्य नाहीत,” असा रोष मतदार व्यक्त करत आहेत.
अनेकांनी बिनधास्त सांगितले —
“सरड्याचा रंग बदलावा तशी मानसिकता घेऊन राजकारणात आलेले हे नेते आता आम्हालाच हवेसे नाहीत. जनता जागी झाली आहे. यावेळी मतपेटीतून उत्तर मिळेल.”
“पाच वर्षे गायब… काम काहीच नाही… आणि निवडणुकीच्या आधी रंग बदलून आमच्याकडे येणार? आता नाही चालणार! यावेळी आम्हीच योग्य धडा शिकवणार!”
ग्रामीण भागात आणि शहरांत या रंग बदलणाऱ्या नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मतदारांचे म्हणणे सोपे आहे —
जनतेचा विश्वास तडा गेलेला असताना पुन्हा मत मागायला येण्याचा नैतिक अधिकार या नेत्यांना राहिलेला नाही.
राजकीय आकडेमोड साधण्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांची नावं ठिकठिकाणी चर्चेत आहेत. काही ठिकाणी तर मतदारांनी सरळ सांगितले —
“विकासाच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस… पण प्रत्यक्षात शून्य काम. अशा लोकांना सत्तेत परत येऊ देणे म्हणजे स्वतःच्या भविष्यातच अंधार निर्माण करणे.”
सामान्य नागरिकांचा सूर स्पष्ट आहे —
“आम्ही शांत आहोत, पण कमजोर नाही! लोकशाहीच्या शक्तीने या रंगबदलू लोकप्रतिनिधींना योग्य जागा दाखवू.”निवडणुकीचे वातावरण तापत असताना, जनतेतून उमटणारा हा आवाज एका गोष्टीची खात्री देतो —यावेळी ‘रंग बदलून’ मत मागायला येणाऱ्यांना मतदारांकडून मिळणार आहे तो एक तुफानी व स्पष्ट संदेश!