सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली :: चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेतजमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करून त्या ठिकाणी JSW कंपनीचा स्टील प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सुपीक व बारमाही शेतीयोग्य जमिनी उद्योगासाठी वापरणे हे अन्यायकारक असल्याचे सांगत भेंडाळा, फोकुर्डी, फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगाव, दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, सगणापूर, कान्होली, कळमगाव, नवेगाव माल, चाकलपेठ आदी गावांच्या ग्रामसभांनी जमीन अधिग्रहणास विरोध दर्शवत ठराव मंजूर केले आहेत.
चिचडोह व कन्नमवार जलाशयामुळे भेंडाळा परिसरातील शेतजमिनी ओलीताखाली आल्याने या भागातील शेती बारमाही झाली आहे. त्यामुळे येथे उत्पादनक्षम शेती चालते. अशा जमिनी उद्योगासाठी घेणे म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करणे असून, शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर थेट परिणाम होणार आहे, असा शेतकऱ्यांचा दावा आहे.
या संदर्भात भेंडाळा परिसरातील सरपंच, पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या मोठ्या शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. एमआयडीसीसाठी जमीन देण्यास आम्ही तयार नाही, असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी यावेळी मांडला.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेत, “काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्यात आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत. जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत हा प्रश्न शासनदरबारी जोरदारपणे मांडला जाईल,” असे आश्वासन दिले.








