SONU WALKE, DEPUTY EDITOR, LOKWAD NEWS.
चामोर्शी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास उरलेला नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सोनू वाळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभारामुळे आणि ईव्हीएम प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांमुळे लोकशाहीची मूलभूत मूल्ये धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापेक्षा त्या रद्द कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.
सोनू वाळके म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आणि सक्षम नेतृत्व निवडण्यासाठी असतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत सामान्य मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणात संशय निर्माण झाला आहे. निवडणुकीत पैसा, दबाव आणि राजकीय हस्तक्षेप वाढल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नसून दलाल आणि आर्थिक ताकद असलेले घटक पुढे येत असल्याची भावना जनतेमध्ये वाढत आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि जनतेसमोर उत्तरदायी करण्यासाठी व्यापक सुधारणा होणे आवश्यक आहे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून जनतेचा विश्वास आणि सहभाग हे तिचे खरे बळ आहे. तोच विश्वास डळमळीत होत असेल तर ही चिंतेची बाब आहे.
“लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रियेवरील सर्व शंका दूर करून संपूर्ण पारदर्शकता आणावी. अन्यथा निवडणुका हा फक्त खर्चिक आणि निरर्थक सोपस्कार ठरेल,” असे मत सोनू वाळके यांनी व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.