SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.

गडचिरोली, प्रतिनिधी : हिरापूर–मुस्वला परिसरातील प्रस्तावित विमानतळ तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांची जमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विमानतळ व एमआयडीसी प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला जिल्हा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे.
दिनांक ४ जून रोजी होणाऱ्या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देतील, असेही अॅड. कोवासे यांनी नमूद केले आहे.
“शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय द्यावा,” अशी मागणी अॅड. विश्वजित कोवासे यांनी केली आहे.
दरम्यान, प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना व नागरिकांनीही आवाज उठविला असून, आगामी आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.