राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, विकास आणि संधी पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे, हा संदेश देणारा प्रसंग पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत पाहायला मिळाला. गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कारावेळी राष्ट्रीय अध्यक्षांनी ॲड. कोवासे यांचे अभिनंदन करत गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि विविध सामाजिक घटकांनी नटलेल्या जिल्ह्यात युवक काँग्रेसची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेसची विचारधारा गावागावात पोहोचवत सर्वसामान्य युवक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनीही आपल्या भूमिकेतून स्पष्ट संदेश देत सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक समाजघटक, प्रत्येक जात, धर्म आणि वर्गाला सोबत घेऊन युवक काँग्रेसची संघटना उभी केली जाईल. राजकीय मतभेद असले तरी विकासाच्या प्रश्नांवर सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीला महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रीय सचिव अजय चिकारा, महाराष्ट्राचे सहप्रभारी नवज्योतसिंग सिंधु, सहप्रभारी शांभवी शुक्ला, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, प्रदेश सचिव सौरभ पाटील म्हशाखेत्री यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील युवकांच्या अपेक्षा, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेती आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून ॲड. विश्वजीत कोवासे यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांचा झालेला सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नसून गडचिरोलीच्या युवक शक्तीचा गौरव असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. आता हे नेतृत्व जात-पात, धर्म आणि पक्षीय सीमांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी किती प्रभावीपणे लढते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.