चामोर्शी, दि. 3 जून : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम वार्ड क्र 8 येथील रहिवासी दिनानाथ गव्हारे यांच्या भूमापन क्र 1388 या मालकी जागेवरच होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, नगरपंचायत प्रशासनाने नोटीस बजावूनही बांधकाम सुरूच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
चामोर्शी येथील रहिवासी श्री. दिनानाथ सखाराम गव्हारे यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, श्रीमती सुमित्रा सुरमा सातपुते, दीपक सुरमा सातपुते व छाया दीपक सातपुते यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. मात्र संबंधित बांधकाम स्वतःच्या मालकीच्या जागेऐवजी नगर भूमापन क्रमांक १३ वरील गव्हारे यांच्या जागेवर करण्यात येत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित बांधकाम त्यांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर तसेच मोरीवर करण्यात आले असून त्यामुळे मार्ग अडथळाग्रस्त झाला आहे. याबाबत विरोध दर्शविल्यानंतर संबंधितांकडून धमकावण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने १३ मे २०२६ रोजी नगरपंचायत चामोर्शी येथे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर १५ मे रोजी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बांधकामास मनाई केल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतरही बांधकाम सुरूच राहिल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, नगरपंचायत प्रशासनाने २९ मे २०२६ रोजी संबंधितांना बांधकाम बंद ठेवण्याबाबत नोटीस बजावली. मात्र नोटीस मिळाल्यानंतरही बांधकाम वेगाने सुरू असल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नोटीस केवळ कागदावरच?
बांधकाम थांबविण्याचे आदेश देण्यात आले असतानाही काम सुरू राहते कसे? संबंधित ठेकेदारावर किंवा लाभार्थ्यांवर अद्याप कोणती ठोस कारवाई का करण्यात आली नाही? त्या जागेवरील अतिक्रमणाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असे अनेक प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सरकारी जागेवरील कथित अतिक्रमण हटवावे तसेच नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांसह संबंधित ठेकेदारावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत तक्रारदार दिनानाथ गव्हारे यांनी केली आहे.
आता नगरपंचायत प्रशासन या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई करून नियमांचे पालन करवून घेते की नोटीसपुरतीच आपली जबाबदारी संपल्याचे मानते, याकडे चामोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.