SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
प्रेस नोट
गडचिरोली:
जिल्ह्यातील रब्बी हंगामातील मका व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावीत तसेच शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशी गोदाम व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी केली आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मर्यादित सिंचन सुविधांच्या आधारावर अनेक शेतकरी रब्बी हंगामात मका व धान पिकांचे उत्पादन घेत आहेत. दरवर्षी शासनाकडून या शेतमालाच्या खरेदीसाठी केंद्रे सुरू केली जात असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. मात्र यावर्षी पावसाळा जवळ आला असतानाही पुरेशा प्रमाणात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे कोवासे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मका व धानाचे उत्पादन झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र सुरू न झाल्यास धानाची होळी करण्याचा इशारा देत आंदोलन केले होते. तसेच गडचिरोली तालुक्यातील अनेक शेतकरी मका व भात विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांवर वारंवार चकरा मारत असल्याची तक्रार समोर येत आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पेरणीपूर्वी खते, बियाणे व इतर कृषी साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतमाल विक्रीतून आर्थिक तरतूद होणे आवश्यक असते. मात्र प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही कोवासे यांनी केला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर असतानाही प्रशासनाने दखल घेतली नसल्यास जिल्हा काँग्रेस कमिटी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने खरेदी केंद्रे सुरू करून शेतमाल खरेदी प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी केली आहे.