सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली : जिल्हा औद्योगिक विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र सातत्याने पुढे येत आहे. मोठमोठे उद्योग, कोट्यवधींच्या योजना आणि विकासाचे दावे केले जात असले तरी दुसरीकडे रेगडीपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेली एकनसुर, नारानुर आणि ताडपल्ली ,रांजी ही गावे आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या गावांमध्ये आजही धड रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही, तर अनेक आदिवासी कुटुंबे मूलभूत सुविधांपासून वंचित जीवन जगत आहेत. शासनाकडून विविध विकास योजनांची घोषणा केली जाते, मात्र त्या योजना प्रत्यक्षात या दुर्गम भागापर्यंत पोहोचल्या आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील या छोट्या गावांच्या समस्या आणि परिस्थितीकडे अपेक्षित लक्ष दिले गेले का, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. कागदावर विकासाची फाईल बंद होत असली तरी प्रत्यक्षात गावांची परिस्थिती मात्र अजूनही बदललेली दिसत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आता प्रशासनाने या भागातील मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत, विकास केवळ कागदापुरता न ठेवता प्रत्यक्ष गावपातळीवर पोहोचवण्याची मागणी जोर धरत आहे