चामोर्शी, दि. 20 मे : चामोर्शी तालुक्यातील मेंडोळा परिसरातील १४ गावांची जमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी वाढत असून या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळू लागला आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेस समितीने शेतकरी मोर्चाला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावे तसेच प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रिया रद्द करावी, या मागण्यांसाठी शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय, चामोर्शी येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा काँग्रेस समितीने या आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्ष सातत्याने लढत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून परिसरात विविध प्रतिक्रिया उमटत असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. शेतजमीन, उपजीविका आणि स्थानिकांच्या हक्कांचा विचार करूनच प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावेत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या मोर्चामुळे आता जमीन अधिग्रहणाचा मुद्दा अधिक चर्चेत आला असून प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.