पोंभूर्णा व मुल तालुक्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली नुकसान भरपाईची मागणी
चंद्रपूर प्रतिनिधी : जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मका, मिरची, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला मका भिजून खराब झाला असून अनेक ठिकाणी उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या भागांसाठी विशेष मदत जाहीर करण्यात यावी, अशीही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. शेतकरी संकटात असताना शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून मक्का, मिरची व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे तसेच शासनाकडे नुकसान भरपाईसाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.







